खासदार श्रीरंग बारणे यांना मतदान करा - सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन
७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा करणारे तेच पैसे निवडणुकीला खर्च करतील, पण त्यांच्या भूलथापांना बळी न पडता मावळ लोकसभा मतदार संघाच्या पर्यायाने देशाच्या सर्वांगिण विकासासाठी
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना म्हंटले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या पाच वर्षाच्या काळात लोकहिताच्या अनेक योजना आणून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. मग ५० वर्षे सत्ता भोगणाऱ्या काँगेस राष्ट्रवादीला सर्वसामान्यांसाठी योजना का आणता आली नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सिंचन घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे, हा घोटाळा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना जनता कदापिही माफ करणार नाही असे सांगतानाच मावळमध्ये शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार जनता विसरली नाही, असे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या. शेतीला हमीभाव, बिल्डरांकडून होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी रेरा, बेघरला घर, शौचालये, गॅस, विमा, आरोग्यदायी योजना, सेवा हमी कायदा, शासकीय काम करण्याची सुलभता, बँक खाते, मेक ईन इंडिया, स्किल इंडिया, रस्ते, सुरक्षा, अशा अनेक लोककल्याणकारी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवून जगात आपल्या देशाला सर्वात वेगवान अर्थव्यवस्था बनविण्याचे आणि देशाला सक्षम करण्याचे महत्वपूर्ण काम केले. त्यामुळे आपल्या देशाची जगात प्रतिमा उंचावली आहे, असे त्यांनी सांगितले. देशाच्या स्वात्यंत्रला ७५ वर्षे पूर्ण होत असताना प्रत्येकाला स्वतःचा निवारा मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत असल्याचा उल्लेख करतानाच मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा झपाट्याने विकास होत असून त्याला जगामध्ये तोड नाही.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेकापच्या स्वार्थीपणाचा बुरखा फाडला. निवडणूक आली कि रस्त्याचा कामाला खडी टाकायची आणि निवडणूक झाल्यावर तीच खडी उचलून न्यायची हि शेकापची नीती असून कर्नाळा ग्रामपंचायतीत मतदान न केल्यामुळे आदिवासी बांधवांचा पाणी तोडण्याचे पाप शेकापने केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. विकासकामांच्या बाबतीत आपण अग्रेसर आहोत, त्या जोरावर श्रीरंग बारणे यांना मते मिळवून देऊ असे सांगून बारणे यांनी खासदार म्हणून केलेली कामे सर्वसामान्यांच्या हिताची असून ते मोठ्या मनाचा माणूस म्हणून परिचित आहेत. भाजप, शिवसेना, आरपीआय मित्र पक्ष युतीचे कार्यकर्ते हातात हात घालून काम काम करीत आहेत, त्यामुळे बारणे यांचा विजय पक्का आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करून युतीच्या कार्यकर्त्यानी घरोघरी प्रचार करून मताधिक्य मिळविण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी भाषणाच्या सुरुवातीला, माजी खासदार रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर आमच्या पाठीशी आहेत, त्यामुळे भीती नाही असा स्पष्ट निर्वाळा दिला. पनवेल उरणमधून शेकापला नेस्ताबूत करण्याचे काम त्यांनी केले असल्याचा उल्लेख केला. ते पुढे म्हणाले कि पवारांच्या अंतर्गत भांडणामुळे अजित पवारांनी शरद पवारांना घरी बसविण्याचे काम केल्याचा आरोप करतानाच भ्रष्टाचार करणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्योगच आहे, त्यामुळे भ्र्रष्टाचाराने राष्ट्रवादी काँग्रेस बदनाम झाली आहे. तर दुसरीकडे निवडणूक हा शेकापचा मूळ व्यवसाय आहे. शेकाप हा पैसा घेणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शेकापच्या कुबड्या घेऊन चालत आहे तर शोबाजी करून अधिकचा माल लुटण्याचा काम शेकाप करतोय, असा घणाघाती हल्ला बारणे यांनी शेकापवर केला.
अनेक राष्ट्राच्या धमक्या आल्या पण पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही घाबरले नाहीत. लोकसभेत काम करीत असताना त्यांचा सहवास आपल्याला लाभला. देशाच्या विकासासाठी ते अहोरात्र काम करीत आहेत, त्यामुळे देश सुरक्षित ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत, असेही त्यांनी बोलताना स्पष्ट केले.